कन्याशाळा साताराने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी शताब्दी वर्षात पदार्पण केले . त्यानिमित्त शताब्दी वर्षात झालेल्या कार्यक्रमाचा धावता आढावा आपणा समोर सादर करीत आहोत .
कन्याशाळेची सुरुवात –
सप्टेंबर १९२२ मध्ये श्रीमती बाबूताई,श्री.बापूसाहेब देशपांडे, श्री.वाग्भट देशपांडे, श्री.नाथ घाणेकर, डॉ. मो.ना.आगाशे यांच्या उपस्थितीत साताऱ्यात कन्याशाळा सुरू करण्याचा निश्चय केला गेला आणि हे काम श्रीमती कमलाबाई देशपांडे यांच्यावर सोपवण्यात आले. श्रीमती कमलाबाईंनी आण्णासाहेब कर्वे यांच्या आग्रहास्तव हे कार्य स्वीकारले व स्थानिक मंडळींच्या मदतीने २२ ऑक्टोबर १९२२ रोजी दादासाहेब करंदीकर यांच्या वाड्यात कन्याशाळेची सुरुवात केली. पहिल्या दिवशी शाळेत ७ विद्यार्थिनी होत्या. साताऱ्यातील नामवंत वकील कै.रावबहादुर रावजी रामचंद्र काळे यांनी इमारतीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपली पत्नी कै.सौ.सत्यभामाबाई काळे यांच्या स्मरणार्थ आपला रहाता वाडा शाळेसाठी दिला.त्या वाड्याला “कै.सौ.सत्यभामाबाई काळे स्त्री शिक्षण मंदिर” हे नाव दिले गेले.
१९२२ साली सुरु झालेली शाळेची वाटचाल रौप्य महोत्सव , सुवर्ण महोत्सव , हिरक महोत्सव , अमृत महोत्सव , नवती महोत्सव ते शताब्दी महोत्सवापर्यंत सुरु आहे .